मुख्य सामग्रीवर वगळा

बावखळ - वसई तालुक्यातील प्राचीन जलव्यवस्थापन पद्धती

 ॥ श्री गणेशाय नमः ॥


वसई विरार हा पूर्वीपासूनच  हरित पट्टा म्हणून ओळखला जातो . सोनचाफा , तगर आणि इतर फुलशेती, केळी आणि नारळीच्या बागा, आणि इतर भाजीपाला ह्या पट्टयात अगदी विपुल प्रमाणात पिकतो .  पूर्वेला जिवदानीचा आणि बारोंडा देवीचा डोंगर, पश्चिमेला पंचवीसेक किलोमीटरचा समुद्र किनारा, उत्तरेला वैतरणेची खाडी आणि दक्षिणेला उल्हासची (वसईची) खाडी अशा भौगोलिक रचनेत वसलेला हा प्रदेश ! समुद्र आणि खाड्यांमधलं खारट पाणी  सिंचनासाठी वापराला सोयीस्कर नव्हतं . पावसाचं पडलेलं पाणी समुद्र जवळ असल्यामुळे अगदी सहज समुद्रात वाहून जात असे . आणि म्हणूनच सिंचनासाठी बावखळांची निर्मिती झाली .


बावखळ

बाव म्हणजे विहीर आणि खळ म्हणजे खडडा ! म्हणजेच पाणी साठवण्यासाठी विहीरी सारखा गोल खोलाकार खड्डा म्हणजे बावखळ .पण मग त्याला विहीरच का नाही म्हणत हे समजण्यासाठी आपल्याला बावखळांची रचना नीट समजून घ्यावी लागेल .

 चित्र क्र. १ . बावखळांची रचना आणि वैशिष्ट्ये .

चित्र क्रमांक एक मध्ये दाखवल्याप्रमाणे तळाशी बेसॉल्ट खडक सापडतो .बेसॉल्ट खडक हा भुजलधारक आहे . भुसभुशीत कडा ह्या नैसर्गिक उतारावरून  येणाऱ्या पाण्याला आत मध्ये झिरपण्यासाठी मदत करतात . बावखळ गोलाकार किंवा चौकोनी असतं . त्याचा व्यास विहीरी इतका किंवा त्यापेक्षा मोठाही असतो . आजूबाजूला चिंच आंबा अशा गर्द वृक्षांची लागवड करतात जेणेकरून सावलीमुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होतं . त्याच सोबत या पानांचा खच पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतो आणि बाष्पीभवन कमी करतो . भेंड आणि करंज यासारख्या झुडप वर्गीय वनस्पती माती घट्ट धरून ठेवतात जेणेकरून पाण्यासोबत माती बावखळाच्या आत जाणार नाही . ( माहिती सौजन्य : श्री सचिन मर्ती . )

विहीरीशी तुलना केल्यास विहीर ही गोलाकार असते आणि तिचा व्यास कमी असतो . विहीरीच्या कडा दगड विटांनी पक्क्या बांधलेल्या असतात . पावसाचं पाणी  विहीरीत झिरपावं अशी अपेक्षा नसते . उलट तळाशी असलेले नैसर्गिक झरे पाण्याची पातळी ठरवतात . पाणी पिण्यासाठी वापरतात त्यामुळे आजूबाजूला झाडांची लागवड करत नाहीत . कारण झाडांची पानं पाण्यात पडून पाण्याची गुणवत्ता खराब होते .


चित्र क्र . २ .बावखळ, सभोवतालची झाडं, मध्यभागी रहाटाची सुविधा .


चित्र क्र . ३ . बावखळा भोवतीची सावली साठी लावलेली झाडं .


चित्र क्र . ४ . बावखळाभोवतीची झुडूपं

स्वातंत्र्यपूर्व परिस्थिती : -

स्वातंत्र्य पूर्व काळात अनेक कुटूंबांचं मिळून एक बावखळ असे . प्रत्येक कुटूंब त्याचा आलटून पालटून वापर करत असे . बैलजोडी आणि रहाटाचा वापर पाणी उपसण्यासाठी केला जाई . रहाटाला मातीची मडकी जोडली जात , आणि त्यांची रचना अशी असायची की त्यातून थोडंसं पाणी पुन्हा बावखळात परत जाई . तसंच बैलजोडी वापरल्याने बैलांच्या क्षमतेनुसार पाणी उपसा होत असे . दिवसातून ८ तास काम केल्यावर बैलांनाही आराम दिला जाई . त्यामुळे पाणी उपसा नियंत्रित प्रमाणात होई आणि खाली गेलेली पाण्याची पातळी उरलेल्या सोळा तासांच्या कालावधीत पूर्ववत होत असे .  बाहेर पडलेलं पाणी लहान चर खोदून शेतांपर्यंत पोहोचवलं जाई . 

 सध्याची परिस्थिती : -

गेल्या पंचावीसेक वर्षांत वसई विरार नगरपालिका आणि आजच्या घडीला महानगरपालिकेने बरीच धरणं बांधली आणि घरोघरी नळाने पाणी पुरवठ्याची सोय केली . तसंच ह्या भागात झालेल्या आर्थिक आणि सामाजिक सुधारणांमुळे इथल्या तरुणाईला परदेश आणि तिथलं जीवनमान आकर्षित करू लागलं. त्यामुळे पारंपारिक शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष होऊ लागलं . जमिनींना सोन्याचे भाव आले आणि बावखळ जमिनीचा बराचसा भाग व्यापत असल्यामुळे त्यांना बुजवून नवीन इमारती आणि नवीन घर बांधण्याकडे लोकांचा कल वाढला .

औद्योगिकरण आणि यांत्रिकीकरणामुळे बैलांची जागा मोटरनी घेतली . त्यामुळे दिवसाच्या कोणत्या वेळेत आणि किती पाणी उपसा करायचा यावर बंधन उरलं नाही . परिणामी जवळ असलेल्या समुद्राचं खारट पाणी बावखळात जमिनी खालच्या झऱ्यांमधून शिरू लागलं. पाण्याची आणि जमिनीची गुणवत्ता बिघडली . काही बावखळं तर आज बेवारस पणे पडून आहेत . त्यांत कचरा घाणीचं साम्राज्य आहे . फक्त काहीच बावखळं अशी आहेत ज्यांचा आजही सिंचना साठी वापर होतो . ती बर्‍यापैकी सुस्थितीत आहेत ( चित्र क्रं. २, ३, ४ ) .


चित्र क्र. ५ . बावखळांची दुर्दशा .



पृथिव्यां त्रीणि रत्नानी जलमन्नं सुभाषितं ।
मुढैः पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते ॥

अर्थात पृथ्वीवर तीनच रत्न आहेत . जल अन्न आणि सुभाषित ! पण मुर्ख लोक दगडाच्या तुकड्याला रत्न संज्ञेने ओळखतात .

लोभ असावा !
राहुल अभ्यंकर, विरार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शरभ - गडकिल्ल्यांच्या द्वार शिल्पांमधील एक पौराणीक प्राणी

शरभ - गडकिल्ल्यांच्या द्वार शिल्पांमधील एक पौराणीक प्राणी ॥ श्री गणेशाय नमः ॥ भारतीय संस्कृती साठी वैदिक आणि पौराणिक हे महत्त्वाचे कालखंड आहेत . या कालखंडामधले काही देव, दैवत, यक्ष, गंधर्व, अप्सरा,दहा दिशांचे दिक्पाल हे जरी कालबाह्य झाले असले तरी मुर्त्यांचा स्वरूपातून ते आजही नजरेस पडतात . यातल्या बऱ्याचशा मुर्त्या त्यांच्या शैलीवरून ओळखता येतात पण बऱ्याचश्या किल्ल्याच्या मुख्य दारावर आढळणारी शरभ ह्या प्राण्याची शिल्पं आजही सर्वसामान्यांना गोंधळात टाकतात .  चित्र क्रमांक १ . जलदुर्ग अर्नाळा येथील प्रवेशद्वारा वरील शरभ शिल्प . चित्र क्रमांक एक मध्ये दिसणारा हत्तीच्या वरचा वाघ की सिंह असा बुचकळ्यात टाकणारा प्राणी म्हणजेच शरभ होय ! शरीर यष्टी वाघ सिंहाशी जरी मिळतीजुळती असली तरी तोंड मात्र अगदी वेगळं आहे . सर्वात महत्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे ह्या शरभांचं शिल्प गडांच्या दरवाजावर का असतं ? त्यासाठी थोडा पुराणांचा संदर्भ घेऊया . विष्णूनें नृसिंहरूप धारण करून हिरण्यकशिपूस मारले; पण खून चढल्यामुळे त्याची उग्रता कमी होईना; तेव्हां सर्व सृष्टि शंकरास शरण गेली; शंकराने दोन तोंडे...

रावणानुग्रह - शिवमूर्तये नम: !

हर हर महादेव  प्राचीन मंदिरांची विविध उप अंगे आहेत. त्यातलं सर्वात लक्षणीय अंग म्हणजे मंडोवर म्हणजेच मंदिराची बाह्य भिंत. ह्या बाह्य भिंतीवर मंदिराच्या आतल्या देवते सोबतच्या इतर उप देवता , त्या मुख्य देवतेचे अवतार कार्य , काही प्रसंगी रामायण, महाभारत इत्यादी पौराणिक कथांचे , युद्ध प्रसंगांचे शिल्प किंवा शिल्प पट आढळतात. सर्वात जास्त शंकर आणि विष्णूची देवळं आढळतात आणि जो देव मुख्य गाभाऱ्यात स्थापित असेल, त्याची शिल्पं जास्त आणि दुसऱ्याची काही मोजकी शिल्पं ह्या बाहय भिंतीवर आढळतात. त्यातली सर्वात आकर्षक आणि नित्य आढळणारी मूर्ती म्हणजे रावणानुग्रह ! आकर्षक ह्यासाठी की सदर मूर्तीमध्ये अनेक रसांचं वर्णन आहे जसं की वीर, करुणा,शृंगार, भय इत्यादी ! हे सर्व रस आणि कैलास पर्वत, शिवाचे गण, दास, दासी, नंदी इत्यादी दाखवताना मूर्तिकाराच्या कौशल्याचा कस लागतो. मंदिरात आढळणाऱ्या या बऱ्याच मूर्ती एकमेव शिल्प नसून अनेक शिल्पांचा शिल्पपट असतो. शिल्पपट समजण्याकरता त्याची मूळ कहाणी माहीत असावी लागते आणि त्या मूळ कहाणीचा आधार घेत संपूर्ण शिल्पाची कल्पना सहज करता येते. रावणानुग्रह या शिल्पाची कहाणी : - ए...

गणरायाचं खरं रूप: शास्त्र, संस्कृती आणि पर्यावरणपूरक मूर्ती !

 ||  श्री गणेशाय नम:  || " अरे राहुल ! गणपतीचे डोळे कधीही सरळ एका रेषेत आणि आडवे नसतात. गणपती हे गजवक्त्र म्हणजे हत्तीचे तोंड/मुख असलेली देवता आहे. आणि हत्तीचे डोळे तिरके असतात. तुम्ही मुंबईकरांनी स्वतःला वाट्टेल तसा गणपती घडवलात. त्याला उगाचच मानवी स्वरूप दिलंत. माणसासारखे सरळ आणि आडवे डोळे असल्यामुळे तो गणपती माणसासारखा दिसतो आणि त्यामुळे कदाचित तो तुम्हाला लोभस वाटतो. पण हि प्रथा बरी नव्हे. " इति नंदा आजोबा.  कैक वर्षांपूर्वी मी आमच्या मूळ गावी ( मिरज ) गेलो होतो. मी सुध्दा कैक वर्ष विरारच्या  गणपतीच्या कारखान्यात काम शिकत होतो. सहज म्हणून गावच्या कारखान्यात एक चक्कर मारली. सर्व गणपती थोडे वेगळे दिसले. आमच्या मुंबईत नाही असं बनत, तुमच्याकडचे साचे थोडे वेगळे आहेत. त्यावर नंदा आजोबांनी मला हे उत्तर दिलं. मुळातच तेव्हा माझी गणपती आणि मूर्ती शास्त्राबद्दलची जाण तशी बेताचीच असल्यामुळे तो विषय मग अलगद मागे पडला. पण कालांतराने मी ह्या मूर्तिशास्त्राचाअभ्यास सुरु केल्यावर मला आजोबा काय म्हणत होते ते स्पष्टपणे उलगडू लागले. अजून खोल खोल शोध घ्यायला सुरु केला तेव्ह...