मुख्य सामग्रीवर वगळा

वीरगळ - गोधन संरक्षक ( भंडारदरा रतनवाडी )

गोधन संरक्षणाचा वीरगळ - अमृतेश्वर मंदिराजवळ , रतनवाडी, भंडारदरा

॥ हर हर महादेव ॥

यांत्रिकीकरण आणि औद्योगिकरणाच्या आधीच्या युगात पशुधन हे पण माणसाची मालमत्ता समजली जाई . ब्रिटीश काळात आणि थोडं त्यापूर्वीच्या काळात ओसरीवर झोपाळा , स्वतःची विहीर आणि गुराढोरांचा पसारा असणारा माणूसही श्रीमंत समजला जाई . शेतीसाठी पशूपालनाची गरज आणि त्या निमित्ताने का होईना पशू पक्ष्यांशी माणसांचा जिव्हाळा होता . वैदिक काळात तर गायींचा वापर चलन म्हणून केला जाई . मग कालांतराने विकत घेतलेल्या वस्तूच्या मोबदल्यात अर्धी गाय किंवा पाव गाय देणे शक्य नसल्याने इतर वस्तूंची देवाणघेवाण सुरु झालं . याची अखेर चलन व्यवस्थेत झाली तरी पशुधन, गोधन हे शब्द आजही व्यवहारात आहेत . ( संदर्भ : - प्राचीन भारतीय नाणकशास्त्र , एम. के . ढवळीकर ) . 

 ह्या पशुधनावर अनेकदा हल्ले होत असत . कधी श्वापदं ( वाघ , सिंह , कोल्हा इत्यादी ) , तर कधी टोळीयुद्ध, तर कधी चोर दरोडेखोर, इतर राज्यातले सैनिक इत्यादी पशुधनावर हल्ला करत असत . अशा वेळेला स्वतःचं पशुधन वाचवायला लोक प्राणांची बाजी लावायला ही कमी करत नसत . आणि जर या प्रसंगात ते मृत्यूमुखी पडले तर त्यांच्या बलिदाना प्रित्यर्थ त्यांच स्मारक दगडात घडवलं जाई जे येणाऱ्या पिढ्यांना साक्ष देई . असाच एक पशुधनाशी संबंधित एक वीरगळ आपण पाहणार आहोत .


चित्र क्र . १. बेवारस पडलेले वीरगळ, रतनवाडी , भंडारदरा .


चित्र क्रमांक १ मध्ये वीरगळ असेच झाडाच्या कडेला टेकवून ठेवलेले दिसत आहेत . न जाणो किती ऊन पावसाळे पाहीले असतील त्यांनी ! 


चित्र क्र . २ वर्षानुवर्षांच्या ऊन पावसाच्या आघाताने झिजलेला वीरगळ

चित्र क्रमांक दोन मध्ये झिजलेला वीरगळ दिसतो . वीरगळावर बहुतेक वेळा कोणत्याही प्रकारचं लेखन केलं जात नाही . त्यामूळे त्याच्या इतिहासाचा स्पष्ट मागोवा घेता येत नाही . तरीही त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून प्रसंग पुन्हा एकदा उभा केला जाऊ शकतो. सदर वीरगळ झिजला असल्याने मी त्याला थोडं संपादित करून समजता येईल असा प्रयत्न केला आहे .


चित्र क्र . ३ . वीरगळाचे संपादित केलेले छायाचित्र .

चित्र क्रमांक ३ मध्ये दाखावलेल्या वीरगळाचे एकूण ४ कप्पे करून त्याला समजता येईल आणि प्रसंग पुन्हा उभा करता येईल . ( चित्र क्रमांक २ आणि ३ ची तुलना करून पाहाणे ) .

कप्पा क्र १ - सर्वात खालचा कप्पा .

सर्वसाधारणतः वीरगळाचा सर्वात खालचा कप्पा हा त्याच्या मृत्युचं कारण दर्शवतो . सर्वात खालच्या कप्प्यात ( पिवळ्या रंगात ) वीर मरून पडलेला दिसतो . त्याच्या सभोवती ( पांढऱ्या रंगात ) पशुधन उभे दिसते. प्रथमदर्शनी पाहताना असे वाटू शकते की तो वीर त्यांच्या पायदळी आला असावा . मात्र ते तसं नसून त्यांना वाचवताना तो धारातिर्थी पडला असं अभिप्रेत आहे.

कप्पा क्र . २ खालून दुसरा कप्पा

हा कप्पा घनघोर युद्ध दर्शवतो . धारातिर्थी पडलेला वीर ( पिवळ्या रंगात डावीकडे ) हातात ढाल आणि तलवार ( हिरवा रंग ) घेऊन लढताना दिसतो . तर त्याच्या समोर घोड्यांवर ( पांढरा रंग ) बसून हातात तलवारी ( हिरवा रंग ) घेऊन  दोन स्वार ( पिवळा रंग ) येताना दिसतात . लढाई तुल्यबळ नसली तरी अशा सेने समोर धावून जाऊन त्वेषाने लढण्याचा पराक्रम वीराने केलेला दिसतो .

कप्पा क्र . ३ खालून तिसरा कप्पा

हा कप्पा वीराला वीरगती प्राप्त झाली असं दर्शवतो . डावीकडे एक पुरोहीत ( पिवळा रंग ) ( जटाभारा वरून ओळखावं ) शिवपिंडीवर भस्मलेपन करताना आणि मंत्रोच्चारण करताना दिसतो . उजवीकडे दोन वीर ( पिवळा रंग ) शिवलिंगाची पूजा करताना दिसतात . वीर मरणामुळे झालेली स्वर्गप्राप्ती ह्या कप्प्यात दर्शवतात .

कप्पा क्र . ४ सर्वात वरचा कप्पा .

हा कप्पा कलश ( आकाशी रंग ) दर्शवतो . सदर कलश हा त्या वीराला मोक्ष प्राप्त झाला याचं प्रतिक आहे . सर्वसाधारणतः कलशाभोवती वाघ, सिंह किंवा शरभ ( शरभ म्हणजे ? ) हे कलशाचे संरक्षक म्हणून कोरले जातात . किंवा सुर्य चंद्र ( यावत् चंद्र दिवाकरो ) कोरले जातात . सदर  वीरगळावर कलशाभोवती जे काही कोरलं आहे ते अत्यंत अस्पष्ट आहे त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही .

थोडक्यात सदर वीरगळ न बोलताही त्या काळची शिल्पकला , समाजव्यवस्था, लोकांच्या मनोअवस्था आणि तत्कालीन समजुतीं बदद्ल बरंच काही सांगून जातो . म्हणूनच यांचं संवर्धन करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे . वस्तूचं मूल्यं माहीत नसेल तर कसं काय कोणी तिला सांभाळेल ? ती कळावी म्हणून हा लेखप्रपंच .

लोभ असावा ....!
राहुल अभ्यंकर , विरार

अजून माहीती, छायाचित्र आणि अभिप्रायासाठी इन्स्टाग्राम वर संपर्क करा .

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
खूप छान आणि सूचक अशी माहिती इथे वाचायला उपलब्ध करून दिली आहेस..तुझे खूप खूप आभार😊🌹💐
अनामित म्हणाले…
खुप छान !
अनामित म्हणाले…
खूप सुंदर ठळक पने वर्णन केले आहे सर तुम्ही..खूप छान🙏👍
अनामित म्हणाले…
खुप छान
सखोल अभ्यास केला आहे, फोटो मुळे आणखीन स्पष्टता झाली
आनंद झाला
Rahul Abhyankar म्हणाले…
मनःपूर्वक धन्यवाद !
Rahul Abhyankar म्हणाले…
मनःपूर्वक धन्यवाद !
अनामित म्हणाले…
अभ्यासपूर्ण लेखन...
अनामित म्हणाले…
खूप छान माहिती दिली आहे , आमच्या फैजपूर तालुका यावल जिल्हा जळगाव येथेही असे बरेच विरगळ गांवाबाहेर नदीच्या पार असलेल्या स्मशान भूमी जवळ होते , तो काळ होता 1950-51ते 1966-67 , बालपणी माझ्या आईसोबत मी पूजेसाठी जायचो ,सोबत इतर महिलाही असत ,नंतर मी नोकरी निमित्ताने बाहेर गांवी गेल्याने तिथे त्या विरगळांचं काय झालं कळलंच नाही ,पण मला दुःख याचं वाटतं की त्यापैकी तिथे आता एकही नाहीय , बालपणी मला त्यातलं काही कळत नव्हतं तरीही मला त्याविषयी आजही श्रद्धा आहे ,
कृपया मला आपला संपर्क नंबर माझ्या 9272303212 ह्या नंबरवर देऊन सहकार्य करावे ,
अनामित म्हणाले…
आपण खूप अभ्यासपूर्ण विवरण दिले असून आपले मनःपुर्वक धन्यवाद
Rahul Abhyankar म्हणाले…
खूप खूप धन्यवाद
Rahul Abhyankar म्हणाले…
मनःपूर्वक धन्यवाद
अनामित म्हणाले…
खूप छान माहिती . विरगळ शब्द फक्त ऐकला होता. पण तूझे लेखन वाचूनच माहिती कळली. आणि फोटोमुळे जास्त छान कळले.
आनंद झाला तूझ्या अभ्यासपूर्ण लेखना बद्दल तूझ खुप खुप अभिनंदन
Rahul Abhyankar म्हणाले…
खूप खूप आभार

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शरभ - गडकिल्ल्यांच्या द्वार शिल्पांमधील एक पौराणीक प्राणी

शरभ - गडकिल्ल्यांच्या द्वार शिल्पांमधील एक पौराणीक प्राणी ॥ श्री गणेशाय नमः ॥ भारतीय संस्कृती साठी वैदिक आणि पौराणिक हे महत्त्वाचे कालखंड आहेत . या कालखंडामधले काही देव, दैवत, यक्ष, गंधर्व, अप्सरा,दहा दिशांचे दिक्पाल हे जरी कालबाह्य झाले असले तरी मुर्त्यांचा स्वरूपातून ते आजही नजरेस पडतात . यातल्या बऱ्याचशा मुर्त्या त्यांच्या शैलीवरून ओळखता येतात पण बऱ्याचश्या किल्ल्याच्या मुख्य दारावर आढळणारी शरभ ह्या प्राण्याची शिल्पं आजही सर्वसामान्यांना गोंधळात टाकतात .  चित्र क्रमांक १ . जलदुर्ग अर्नाळा येथील प्रवेशद्वारा वरील शरभ शिल्प . चित्र क्रमांक एक मध्ये दिसणारा हत्तीच्या वरचा वाघ की सिंह असा बुचकळ्यात टाकणारा प्राणी म्हणजेच शरभ होय ! शरीर यष्टी वाघ सिंहाशी जरी मिळतीजुळती असली तरी तोंड मात्र अगदी वेगळं आहे . सर्वात महत्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे ह्या शरभांचं शिल्प गडांच्या दरवाजावर का असतं ? त्यासाठी थोडा पुराणांचा संदर्भ घेऊया . विष्णूनें नृसिंहरूप धारण करून हिरण्यकशिपूस मारले; पण खून चढल्यामुळे त्याची उग्रता कमी होईना; तेव्हां सर्व सृष्टि शंकरास शरण गेली; शंकराने दोन तोंडे...

गणरायाचं खरं रूप: शास्त्र, संस्कृती आणि पर्यावरणपूरक मूर्ती !

 ||  श्री गणेशाय नम:  || " अरे राहुल ! गणपतीचे डोळे कधीही सरळ एका रेषेत आणि आडवे नसतात. गणपती हे गजवक्त्र म्हणजे हत्तीचे तोंड/मुख असलेली देवता आहे. आणि हत्तीचे डोळे तिरके असतात. तुम्ही मुंबईकरांनी स्वतःला वाट्टेल तसा गणपती घडवलात. त्याला उगाचच मानवी स्वरूप दिलंत. माणसासारखे सरळ आणि आडवे डोळे असल्यामुळे तो गणपती माणसासारखा दिसतो आणि त्यामुळे कदाचित तो तुम्हाला लोभस वाटतो. पण हि प्रथा बरी नव्हे. " इति नंदा आजोबा.  कैक वर्षांपूर्वी मी आमच्या मूळ गावी ( मिरज ) गेलो होतो. मी सुध्दा कैक वर्ष विरारच्या  गणपतीच्या कारखान्यात काम शिकत होतो. सहज म्हणून गावच्या कारखान्यात एक चक्कर मारली. सर्व गणपती थोडे वेगळे दिसले. आमच्या मुंबईत नाही असं बनत, तुमच्याकडचे साचे थोडे वेगळे आहेत. त्यावर नंदा आजोबांनी मला हे उत्तर दिलं. मुळातच तेव्हा माझी गणपती आणि मूर्ती शास्त्राबद्दलची जाण तशी बेताचीच असल्यामुळे तो विषय मग अलगद मागे पडला. पण कालांतराने मी ह्या मूर्तिशास्त्राचाअभ्यास सुरु केल्यावर मला आजोबा काय म्हणत होते ते स्पष्टपणे उलगडू लागले. अजून खोल खोल शोध घ्यायला सुरु केला तेव्ह...

विरगळ - Hero stone नौकादलाचा वीरगळ ( महाराष्ट्रातील एकमेव ) एकसार ( बोरिवली , मुंबई )

                      ॥ श्री गणेशाय नमः ॥ हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसि महिम् । तस्मादुतिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय ॥  भगवदगीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या ३६ व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करताना म्हणतात की " हे अर्जुना ! युद्धासाठी तयार हो कारण युद्धात मरण पावला तर तुला स्वर्गप्राप्ती होईल आणि जर का तुझा विजय झाला तर पृथ्वीचे राज्य उपभोगायला मिळेल त्यामुळे युद्धाचा निश्चय कर आणि तयार हो. " आपल्या शास्त्रानुसार फार पूर्वीपासून युद्धांमध्ये वीरमरणाची प्राप्ती व्हावी याला अपार महत्व दिले गेलंय. आणि अशा या वीरांचे स्मरण येणाऱ्या पिढीला कायमस्वरूपी होत राहावं म्हणून जो शिल्प विशेष उदयाला आला तो म्हणजे विरगळ (Herostone )! वीरगळ समजून घेण्यासाठी त्याच्या मुळ संरचनेला समजून घ्यावं लागतं. काळ आणि स्थानपरत्वे त्याच्या रचनेत थोडं भिन्नत्व आहे परंतु वीर मरण आलेल्याचं स्वर्गरोहण आणि स्वर्गप्राप्ती या मूलभूत गोष्टी प्रत्येक शिल्पात आढळून येतात .  वीरगळ बनवण्याची संकल्पना ही साधारणतः सातवाहन क...