मुख्य सामग्रीवर वगळा

विरगळ - Hero stone नौकादलाचा वीरगळ ( महाराष्ट्रातील एकमेव ) एकसार ( बोरिवली , मुंबई )

                      ॥ श्री गणेशाय नमः ॥


हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसि महिम् ।
तस्मादुतिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय ॥ 

भगवदगीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या ३६ व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करताना म्हणतात की " हे अर्जुना ! युद्धासाठी तयार हो कारण युद्धात मरण पावला तर तुला स्वर्गप्राप्ती होईल आणि जर का तुझा विजय झाला तर पृथ्वीचे राज्य उपभोगायला मिळेल त्यामुळे युद्धाचा निश्चय कर आणि तयार हो. "

आपल्या शास्त्रानुसार फार पूर्वीपासून युद्धांमध्ये वीरमरणाची प्राप्ती व्हावी याला अपार महत्व दिले गेलंय. आणि अशा या वीरांचे स्मरण येणाऱ्या पिढीला कायमस्वरूपी होत राहावं म्हणून जो शिल्प विशेष उदयाला आला तो म्हणजे विरगळ (Herostone )! वीरगळ समजून घेण्यासाठी त्याच्या मुळ संरचनेला समजून घ्यावं लागतं. काळ आणि स्थानपरत्वे त्याच्या रचनेत थोडं भिन्नत्व आहे परंतु वीर मरण आलेल्याचं स्वर्गरोहण आणि स्वर्गप्राप्ती या मूलभूत गोष्टी प्रत्येक शिल्पात आढळून येतात . 

वीरगळ बनवण्याची संकल्पना ही साधारणतः सातवाहन काळ म्हणजे सुमारे २२०० वर्षांपूर्वीपासून चालत आली आहे .सातवाहनांच्या व्यतिरिक्त वाकाटक, शिलाहार, राष्ट्रकुट, यादव ते अगदी मराठा साम्राज्य पर्यंत नियमित युद्ध आपण ऐकत आलो आहोत . साम्राज्यविस्तार आणि साम्राज्य संरक्षण ह्या दोन्हीसाठी युद्ध अटळ होतं. आज आपण जो वीरगळ बघणार आहोत तो महाराष्ट्रातला अत्यंत अनोखा असा नौकायुद्धाचा प्रसंग कोरलेला आणि महाराष्ट्रातला एकमेव ( नौकायुद्धाचा प्रसंग कोरलेला ) शिल्पपट आहे.

 चित्र क्रमांक १ . बोरीवली मधील एकसार गावातील शिलाहार कालीन नौकादल निदर्शक वीरगळ .

वर निर्देशित केल्याप्रमाणे चित्र क्रमांक एक मध्ये वीरगळाच्या दुसऱ्या टप्प्यात शिवपिंडी दिसून येते आणि संपूर्ण चित्रात वेगळी आणि उठावदार दिसणारी वस्तू म्हणजे त्या शिवपिंडीवर वाहिलेलं गुलाबी रंगाचे फूल ! वस्तुतः याच्या बाजुलाच एक अत्यंत सुंदर आणि लहानसं शिवमंदिर आहे .पण जुनं ते सोनं या हिशोबाने लोक आजही या वीरगळावरच्या शिवपिंडीला आस्थेने पुजतात .त्यामुळे आजही अज्ञान आणि आस्थेचा सुंदर मिलाफ बऱ्याचशा वीरगळांवरती दिसून येतो . म्हणूनच या लेखामध्ये मी वीरगळाचा प्रत्येक टप्पा आणि कप्पा उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे .

चित्र क्रमांक २ . एकसार गावातील वीरगळाचा सर्वात खालचा कप्पा (लढाई निर्देशक ).

सर्वसाधारणतः वीरगळाचा सर्वात खालचा टप्पा हा वीराच्या मृत्यूचं कारण दर्शवण्यासाठी असतो . यामध्ये विविध प्रकार असून त्याप्रमाणे वीरगळांचं वर्गीकरण केलं जातं. चित्र क्रमांक दोन मध्ये दाखवल्याप्रमाणे सदर वीरगळ हा नौका दलाच्या युद्धामध्ये आलेल्या वीराच्या वीरमरणाला दर्शवण्यासाठी उभारला गेला आहे . या सर्वात खालच्या कप्प्यामध्ये ३ नौका दिसून येतात. बारकाईने निरीक्षण केल्यास त्या शिडाच्या नौका होत्या हे दिसून येतं .सातवाहन काळामध्येच मोसमी वाऱ्यांचा शोध लागला होता आणि त्याचा वापर मुख्यत्वे व्यापारासाठी केला जात होता .सातवाहनांच्या नाण्यांवरती मिळालेलं जहाजाचं चित्र हे अधोरेखित करतं की अगदी तेव्हापासून आरमाराचं अस्तित्व भारतात होतं. शिडांव्यतिरिक्तही वल्ह्यांचा वापर नौकानयनासाठी केला जात असल्याचं दिसतं. मधल्या बोटीत बारकाईने लक्ष दिलं तर लढणारी माणस धनुष्यबाणाचा वापर करताना दिसतात तर काहीजण वल्ही मारताना दिसतात त्याचबरोबर नौकेच्या शेवटी एक माणूस सुकाणू धरून नौकेला दिशा दाखवताना स्पष्ट दिसून येतो आणि त्याला लागूनच असलेला दुसरा माणूस शिडाची दोरी सांभाळताना दिसतो. शिल्पकाराच्या कमी जागेत खच्चून जास्त शिल्प भरण्यामागचा उद्देश हा त्या घनघोर लढाईचं स्पष्ट शिल्पांकन व्हावं असा दिसतो. थोडक्यात ज्या वीराला मरण आलं ते ह्या नौका दलाच्या युद्धामध्ये आलं आणि ती लढाई बरीच घनघोर झाली असावी असं यातून आकलन होतं .


चित्र क्रमांक ३ . एकसार गावातील वीरगळाचा खालून दुसरा कप्पा ( स्वर्ग प्राप्ती निर्देशक )

सर्वात खालच्या कप्प्यात लढाईचा प्रसंग घडल्यावर त्याच्या वरच्या कप्प्यात सहसा त्या वीराला स्वर्ग प्राप्ती झाली असं अभिप्रेत करणारे शिल्प कोरलं जातं. वीराचं शौर्य आणि पराक्रम या कप्प्यातून सहज दाखवलं जातं. चित्र क्रमांक तीन मध्ये मध्यभागी असलेली शिवपिंडी वीर शिवाचा उपासक असल्याचा दर्शवते. त्याच बरोबर वीरमरण आल्यामुळे त्याच्या स्वर्ग प्राप्तीचा प्रसंग दर्शवते.  चित्र क्रमांक तीन मध्ये शिवपिंडीवर  (उजवीकडे) वाहिलेल्या गुलाबी रंगाच्या फुला च्या बाजूला एक पुरोहित उभा दिसतो. उजव्या हातातल्या भस्माच्या पुरचुंडीतून तो शंकरावरती भस्मलेपन करत असल्याचं दिसतं. पुरोहिताच्या मागे असलेल्या अप्सरा या सितार / वीणा सदृश्य तंतुवाद्य घेऊन गायन वादन करताना दिसतात. त्याच सोबत अप्सरांच्या वरती पुरोहिताचे काही शिष्यगण हे मंत्रोच्चारण करताना दिसतात . शिवपिंडीच्या दुसऱ्या बाजूला (डावीकडे) वीरगती प्राप्त झालेला वीर ( शिल्प भग्नावस्थेत ) चौरंगावर बसलेला दिसून येतो.  पुरोहित त्या वीराला वेदमंत्र सांगतात .

चित्र क्रमांक ४ . एकसार गावातील वीरगळाचा खालून तिसरा कप्पा  (स्वर्गरोहण )

वेदमंत्रांनी संपन्न झालेल्या शिव पूजनानंतर स्वर्गप्राप्ती झालेल्या वीराला अप्सरा स्वर्गात घेऊन जातात. चित्र क्रमांक चार मध्ये मधोमध वीर चौरंगावर बसलेला आढळतो ( वीराची मूर्ती पूर्ण भग्नावस्थेत ). त्याच्या आजूबाजूला चवऱ्या ढाळत उभ्या असलेल्या अप्सरा त्याच्या स्वर्गरोहणाची स्थिती दर्शवतात. वीराचा वेगळा कप्पा हा त्याने गाजवलेल्या अतुलनीय पराक्रमाचं द्योतक असतं. बऱ्याचदा अप्सरा वीराला खांद्यावर उचलून नेताना दाखवतात किंवा या शिल्पाप्रमाणे त्याच्यासाठी विशेष यानाची व्यवस्था केली जाते. 

चित्र क्रमांक ५ . एकसार गावातील वीरगळावरील कलश (मोक्षप्राप्ती ).

वीरगळावरचा कलश मांगल्यासोबतच मोक्षप्राप्तीचंही प्रतिक आहे. चित्र क्रमांक पाच मध्ये कलश अत्यंत सुबकपणे कोरलेला आहे .त्यावरती श्रीफळ ( नारळ ) शोभून दिसतं . श्रीफळाभोवती यक्षिणी फेर धरून नाचताना दिसतात . कलशाचं भव्य आकारमान आणि सौंदर्य , सुबकता हे एका राजाचं वीरगळ असल्यांचं दर्शवतात. कारण इतकं भव्य, सुबक आणि सुरेख शिल्प कोरणाऱ्या शिल्पकाराला उत्तम मानधन द्यावं लागे आणि त्यासाठी राजा किंवा त्याचं राजघराणंच समर्थ असे.

सर्वसाधारणतः कोणत्याही वीरगळावर ब्राम्ही किंवा तत्सम लिपीतला शिलालेख उपलब्ध नसतो. त्यामुळे त्यामागचा अचूक इतिहास हा छातीठोकपणे सांगता येत नाही. परंतू इतिहासकारांच्या मते एकसार येथील वीरगळाबाबत दोन मतप्रवाह आहेत. प्रसिद्ध तत्त्ववेत्ता हेन्री कझिंग यांच्या मते शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वर आणि देवगिरीचा राजा महादेव यादव यांच्यात तेराव्या शतकात झालेल्या घनघोर युद्धात वीरमरण पावलेल्या सोमेश्वराचे हे शिल्पचित्रण आहे. तर डॉ. शिल त्रिपाठी यांच्या मते हे स्मारक गुजरातच्या परमार भोज राजा याच्या कोकण विजयाचे प्रतीक आहे. व इ.स. १०२० साली साष्टी येथील नौकादल निदर्शक वीरगळ जमीन एका ब्राम्हणाला दान दिली, असा निष्कर्ष काढला आहे. 

संदर्भग्रंथ : - इतिहासाचे मूक साक्षीदार वीरगळ आणि सतीशिळा, श्री. अनिल दुधाणे.

अतिरिक्त माहिती आणि छायाचित्रांसाठी इंस्टाग्राम वर फॉलो करा.

राहुल अभ्यंकर, विरार.


चतुर्थमितीचे इतर लेख  















टिप्पण्या

Unknown म्हणाले…
It is really informative .I wasn't aware about it.Thank you.
Unknown म्हणाले…
Nice information....keep posting such informations.
दुर्लक्षीत असलेल्या इतिहास कालीन शिल्पपटा बद्दल अभ्यासपूर्ण माहिती संग्रह करून तसेच प्रत्यक्ष ठिकाणीं जाऊन त्याबद्दल सखोल अभ्यासपूर्ण खूप उपयुक्त संग्रह करावी अशी माहिती प्रसारित केल्या बद्दल आपले अभिनंदन आणि आपले मनपूर्वक आभार🙏🙏
Unknown म्हणाले…
खुप सुंदर कार्य
Unknown म्हणाले…
मित्रवर्य राहुल.
खूप छान लेख लिहिला आहे. चांगला अभ्यास केला आहे. चांगली माहिती तूझ्यामुळे मिळाली. सातवाहन काळात खुप काम झालं आहे. कुणीतरी हे काम करणे आवश्यक आहे. अभिनंदन
Unknown म्हणाले…
मित्रवर्य राहुल,
खूप छान लेख लिहिला आहे. चांगला अभ्यास केला आहे.सातवाहन काळात खुप काम झालं आहे. कुणीतरी हे काम करणे आवश्यक होते. अभिनंदन
Unknown म्हणाले…
खूप छान .. मोजक्या शब्दांत पूर्ण माहिती दिलीस... keep it up....
Unknown म्हणाले…
मस्तच राहूल
Unknown म्हणाले…
खूपच छान विवेचन या संपूर्ण चित्राबद्दल व्यवस्थित आणि खडानखडा माहिती दिलेली आहे प्रत्येक स्तंभात वेगवेगळी काही माणसांची हालचाल सुद्धा नोंदलेली आहे खूपच छान असेच काहीतरी लिहीत जा धन्यवाद
pradeep varma म्हणाले…
अत्यंत माहिती पूर्ण /
राहुल, लेख उशिरा वाचला, पण मेहनतीने केलेले तुझे लेख वाचण्यासाठी निवांतपणा आवश्यक असतो, घाईघाईने वाचत नाही.
विरगळी वर असलेल्या शिल्पाचा सूक्ष्म व अर्थपूर्ण अभ्यास!
कोकणात मालवण जवळ असलेल्या आचरा गावात रामेश्वर मंदिर आहे आणि तिथल्या आवारात असे अनेक स्तंभ उभारलेले आहेत. गावातच राहणारे श्री सुरेश ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे, त्या गावात होऊन गेलेल्या ठाकूर घराण्यातील पुरुषांच्या नावाने ते स्तंभ उभारले आहेत.
त्या बाजूला जाशील तेव्हा जरूर बघ.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शरभ - गडकिल्ल्यांच्या द्वार शिल्पांमधील एक पौराणीक प्राणी

शरभ - गडकिल्ल्यांच्या द्वार शिल्पांमधील एक पौराणीक प्राणी ॥ श्री गणेशाय नमः ॥ भारतीय संस्कृती साठी वैदिक आणि पौराणिक हे महत्त्वाचे कालखंड आहेत . या कालखंडामधले काही देव, दैवत, यक्ष, गंधर्व, अप्सरा,दहा दिशांचे दिक्पाल हे जरी कालबाह्य झाले असले तरी मुर्त्यांचा स्वरूपातून ते आजही नजरेस पडतात . यातल्या बऱ्याचशा मुर्त्या त्यांच्या शैलीवरून ओळखता येतात पण बऱ्याचश्या किल्ल्याच्या मुख्य दारावर आढळणारी शरभ ह्या प्राण्याची शिल्पं आजही सर्वसामान्यांना गोंधळात टाकतात .  चित्र क्रमांक १ . जलदुर्ग अर्नाळा येथील प्रवेशद्वारा वरील शरभ शिल्प . चित्र क्रमांक एक मध्ये दिसणारा हत्तीच्या वरचा वाघ की सिंह असा बुचकळ्यात टाकणारा प्राणी म्हणजेच शरभ होय ! शरीर यष्टी वाघ सिंहाशी जरी मिळतीजुळती असली तरी तोंड मात्र अगदी वेगळं आहे . सर्वात महत्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे ह्या शरभांचं शिल्प गडांच्या दरवाजावर का असतं ? त्यासाठी थोडा पुराणांचा संदर्भ घेऊया . विष्णूनें नृसिंहरूप धारण करून हिरण्यकशिपूस मारले; पण खून चढल्यामुळे त्याची उग्रता कमी होईना; तेव्हां सर्व सृष्टि शंकरास शरण गेली; शंकराने दोन तोंडे...

रावणानुग्रह - शिवमूर्तये नम: !

हर हर महादेव  प्राचीन मंदिरांची विविध उप अंगे आहेत. त्यातलं सर्वात लक्षणीय अंग म्हणजे मंडोवर म्हणजेच मंदिराची बाह्य भिंत. ह्या बाह्य भिंतीवर मंदिराच्या आतल्या देवते सोबतच्या इतर उप देवता , त्या मुख्य देवतेचे अवतार कार्य , काही प्रसंगी रामायण, महाभारत इत्यादी पौराणिक कथांचे , युद्ध प्रसंगांचे शिल्प किंवा शिल्प पट आढळतात. सर्वात जास्त शंकर आणि विष्णूची देवळं आढळतात आणि जो देव मुख्य गाभाऱ्यात स्थापित असेल, त्याची शिल्पं जास्त आणि दुसऱ्याची काही मोजकी शिल्पं ह्या बाहय भिंतीवर आढळतात. त्यातली सर्वात आकर्षक आणि नित्य आढळणारी मूर्ती म्हणजे रावणानुग्रह ! आकर्षक ह्यासाठी की सदर मूर्तीमध्ये अनेक रसांचं वर्णन आहे जसं की वीर, करुणा,शृंगार, भय इत्यादी ! हे सर्व रस आणि कैलास पर्वत, शिवाचे गण, दास, दासी, नंदी इत्यादी दाखवताना मूर्तिकाराच्या कौशल्याचा कस लागतो. मंदिरात आढळणाऱ्या या बऱ्याच मूर्ती एकमेव शिल्प नसून अनेक शिल्पांचा शिल्पपट असतो. शिल्पपट समजण्याकरता त्याची मूळ कहाणी माहीत असावी लागते आणि त्या मूळ कहाणीचा आधार घेत संपूर्ण शिल्पाची कल्पना सहज करता येते. रावणानुग्रह या शिल्पाची कहाणी : - ए...

गणरायाचं खरं रूप: शास्त्र, संस्कृती आणि पर्यावरणपूरक मूर्ती !

 ||  श्री गणेशाय नम:  || " अरे राहुल ! गणपतीचे डोळे कधीही सरळ एका रेषेत आणि आडवे नसतात. गणपती हे गजवक्त्र म्हणजे हत्तीचे तोंड/मुख असलेली देवता आहे. आणि हत्तीचे डोळे तिरके असतात. तुम्ही मुंबईकरांनी स्वतःला वाट्टेल तसा गणपती घडवलात. त्याला उगाचच मानवी स्वरूप दिलंत. माणसासारखे सरळ आणि आडवे डोळे असल्यामुळे तो गणपती माणसासारखा दिसतो आणि त्यामुळे कदाचित तो तुम्हाला लोभस वाटतो. पण हि प्रथा बरी नव्हे. " इति नंदा आजोबा.  कैक वर्षांपूर्वी मी आमच्या मूळ गावी ( मिरज ) गेलो होतो. मी सुध्दा कैक वर्ष विरारच्या  गणपतीच्या कारखान्यात काम शिकत होतो. सहज म्हणून गावच्या कारखान्यात एक चक्कर मारली. सर्व गणपती थोडे वेगळे दिसले. आमच्या मुंबईत नाही असं बनत, तुमच्याकडचे साचे थोडे वेगळे आहेत. त्यावर नंदा आजोबांनी मला हे उत्तर दिलं. मुळातच तेव्हा माझी गणपती आणि मूर्ती शास्त्राबद्दलची जाण तशी बेताचीच असल्यामुळे तो विषय मग अलगद मागे पडला. पण कालांतराने मी ह्या मूर्तिशास्त्राचाअभ्यास सुरु केल्यावर मला आजोबा काय म्हणत होते ते स्पष्टपणे उलगडू लागले. अजून खोल खोल शोध घ्यायला सुरु केला तेव्ह...