मुख्य सामग्रीवर वगळा

सोलापूरजवळील सकाट गावातील वीर स्त्रीचा वीरगळ .

 ॥ हर हर महादेव ॥


चूल आणि मूल इतकीच चाकोरीबद्ध भूमिका स्रियांनी निभावली हे आपल्याला इतिहासकारांनी मनावर अगदी सहजपणे ठसवलं. पण भारतीय इतिहास केवळ पुस्तकांमधून नाही तर शिलालेख, बारव, मंदिरं आणि वीरगळ अशा अनेकोत्तम साधनांमधून वाचता येतो. आपल्याकडे लागते ती केवळ दृष्टी ! 

मागे सोलापूरच्या सहलीमध्ये सकाट गावात एक वीरगळ माझ्या दृष्टीस पडला. मारुतीच्या मंदिरात मारुतीच्या मूर्तीशेजारीच असे दोन वीरगळ पहायला मिळतात. ही गोष्ट मला सर्वत्र आढळली की वीरगळांचा संदर्भ काहीकदा लागत नसल्याने ते गावाच्या वेशीवर, देवळांमध्ये किंवा किल्ल्यांवर कुठेतरी कडेला लावून ठेवलेले दिसतात.


चित्र क्र १ . वीरगळाचे छायाचित्र .


चित्र क्र २. वीरगळाचे संपादित केलेलं छायाचित्र .

वीरगळ म्हणजे एक शिल्पपटच असतो. आणि म्हणून त्याला टप्प्या टप्प्यानेच समजून घ्यावं लागतं.

टप्पा क्र १. खालून पहिला कप्पा.

नेहमीप्रमाणे वीरगळाचा खालचा कप्पा हा वीराच्या मृत्यूचं कारण दर्शवतो. इथे पुरुषांऐवजी दोन स्त्रिया ( पिवळा रंग ) हातात ढाल आणि तलवार घेऊन लढताना दिसतात. गुडघ्यापर्यंत आलेली वस्त्रं, केसांचा बांधलेला अंबाडा, कानात झुलणारी भली मोठी कर्णकुंडलं लक्ष वेधतात. ( चित्र क्र १ . पाहावे ) . 

टप्पा क्र २ . खालून दुसरा कप्पा.

खालून दुसरा कप्पा हा मृत्यूपश्चात घडणाऱ्या गोष्टींचं वर्णन करतो. युद्धभूमीत मृत्यू आलेल्याला स्वर्ग मिळतो अशी शास्त्रात नोंद आहे. त्याप्रमाणे दोन अप्सरा ( हिरवा रंग )ह्या मृत्यू पावलेल्या स्रीला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी आलेल्या दिसतात. स्वतःच्या खांद्यावर बसवून त्या वीर स्त्रीच्या आत्म्याला स्वर्गात नेताना दिसतात. वीर स्त्री स्वत:चे दोन्ही हात अप्सरांच्या खांद्यावर ठेवून उभी दिसते. सोबतच अप्सरा हातातल्या चवऱ्या ( लाल रंग ) ढाळताना दिसतात. चवऱ्या म्हणजे पूर्वी राजे महाराजांच्या बाजूला दासी उभी राहून वारा घालत ते साधन. 

टप्पा क्र ३ . खालून तिसरा कप्पा.

या कप्प्यात वीर स्त्री मांडी घालून बसलेली दिसते. समोरच असलेल्या शिवपिंडी समोर नतमस्तक होऊन शिवआराधना करताना दिसते. स्वर्ग प्राप्ती झाल्यानंतर स्वतःच्या आराध्य देवाचं पूजन करण्याचा प्रसंग सर्वच वीरगळांवर आढळतो. असं असलं तरी बहुतांश वीरगळांवर शिवपिंडच आढळते हे विशेष.

टप्पा क्र ४ . सर्वात वरचा कप्पा.
 
सर्वात वरचा कप्पा हा सदर वीरेला मोक्ष प्राप्ती झाली हे कलशाच्या माध्यामतून दर्शवतो. कलश हा वीरगळाचा आणि वीर मनुष्याचं अंतिम ध्येय दर्शवतो. सहसा कलशाच्या रक्षणासाठी वाघ हत्ती शरभ इ. प्राणी किंवा काही मंगलचिन्ह कोरलेली असतात. ती इथे कुठेही मला आढळली नाहीत.

नेहमीप्रमाणे वीरगळावर कोणताही शिलालेख नसल्याने त्याचा काळ, लढाईचं विशिष्ट कारण इ. गोष्टींचा सहज बोध होत नाही. पण अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या प्रसिद्धी पावलेल्या रणरागिणींसोबतच अश्या काही प्रसिद्धी न पावलेल्या स्त्रियाही संसारासोबतच संरक्षणातही कर्तव्य चोखपणे बजावत होत्या हे कौतुकास्पदच ! 

लोभ असावा !
राहुल अभ्यंकर, विरार.


चतुर्थमितीचे इतर लेख  















टिप्पण्या

Anojkumar म्हणाले…
Nice information. Thanks for sharing. Keep posting.
Tejas Sakpal म्हणाले…
थोडक्यात भरपूर माहिती दिली त्यासाठी धन्यवाद.
Unknown म्हणाले…
खूप छान माहिती मिळाली.
Unknown म्हणाले…
खूप छान माहिती👌👌

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शरभ - गडकिल्ल्यांच्या द्वार शिल्पांमधील एक पौराणीक प्राणी

शरभ - गडकिल्ल्यांच्या द्वार शिल्पांमधील एक पौराणीक प्राणी ॥ श्री गणेशाय नमः ॥ भारतीय संस्कृती साठी वैदिक आणि पौराणिक हे महत्त्वाचे कालखंड आहेत . या कालखंडामधले काही देव, दैवत, यक्ष, गंधर्व, अप्सरा,दहा दिशांचे दिक्पाल हे जरी कालबाह्य झाले असले तरी मुर्त्यांचा स्वरूपातून ते आजही नजरेस पडतात . यातल्या बऱ्याचशा मुर्त्या त्यांच्या शैलीवरून ओळखता येतात पण बऱ्याचश्या किल्ल्याच्या मुख्य दारावर आढळणारी शरभ ह्या प्राण्याची शिल्पं आजही सर्वसामान्यांना गोंधळात टाकतात .  चित्र क्रमांक १ . जलदुर्ग अर्नाळा येथील प्रवेशद्वारा वरील शरभ शिल्प . चित्र क्रमांक एक मध्ये दिसणारा हत्तीच्या वरचा वाघ की सिंह असा बुचकळ्यात टाकणारा प्राणी म्हणजेच शरभ होय ! शरीर यष्टी वाघ सिंहाशी जरी मिळतीजुळती असली तरी तोंड मात्र अगदी वेगळं आहे . सर्वात महत्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे ह्या शरभांचं शिल्प गडांच्या दरवाजावर का असतं ? त्यासाठी थोडा पुराणांचा संदर्भ घेऊया . विष्णूनें नृसिंहरूप धारण करून हिरण्यकशिपूस मारले; पण खून चढल्यामुळे त्याची उग्रता कमी होईना; तेव्हां सर्व सृष्टि शंकरास शरण गेली; शंकराने दोन तोंडे...

गणरायाचं खरं रूप: शास्त्र, संस्कृती आणि पर्यावरणपूरक मूर्ती !

 ||  श्री गणेशाय नम:  || " अरे राहुल ! गणपतीचे डोळे कधीही सरळ एका रेषेत आणि आडवे नसतात. गणपती हे गजवक्त्र म्हणजे हत्तीचे तोंड/मुख असलेली देवता आहे. आणि हत्तीचे डोळे तिरके असतात. तुम्ही मुंबईकरांनी स्वतःला वाट्टेल तसा गणपती घडवलात. त्याला उगाचच मानवी स्वरूप दिलंत. माणसासारखे सरळ आणि आडवे डोळे असल्यामुळे तो गणपती माणसासारखा दिसतो आणि त्यामुळे कदाचित तो तुम्हाला लोभस वाटतो. पण हि प्रथा बरी नव्हे. " इति नंदा आजोबा.  कैक वर्षांपूर्वी मी आमच्या मूळ गावी ( मिरज ) गेलो होतो. मी सुध्दा कैक वर्ष विरारच्या  गणपतीच्या कारखान्यात काम शिकत होतो. सहज म्हणून गावच्या कारखान्यात एक चक्कर मारली. सर्व गणपती थोडे वेगळे दिसले. आमच्या मुंबईत नाही असं बनत, तुमच्याकडचे साचे थोडे वेगळे आहेत. त्यावर नंदा आजोबांनी मला हे उत्तर दिलं. मुळातच तेव्हा माझी गणपती आणि मूर्ती शास्त्राबद्दलची जाण तशी बेताचीच असल्यामुळे तो विषय मग अलगद मागे पडला. पण कालांतराने मी ह्या मूर्तिशास्त्राचाअभ्यास सुरु केल्यावर मला आजोबा काय म्हणत होते ते स्पष्टपणे उलगडू लागले. अजून खोल खोल शोध घ्यायला सुरु केला तेव्ह...

विरगळ - Hero stone नौकादलाचा वीरगळ ( महाराष्ट्रातील एकमेव ) एकसार ( बोरिवली , मुंबई )

                      ॥ श्री गणेशाय नमः ॥ हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसि महिम् । तस्मादुतिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय ॥  भगवदगीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या ३६ व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करताना म्हणतात की " हे अर्जुना ! युद्धासाठी तयार हो कारण युद्धात मरण पावला तर तुला स्वर्गप्राप्ती होईल आणि जर का तुझा विजय झाला तर पृथ्वीचे राज्य उपभोगायला मिळेल त्यामुळे युद्धाचा निश्चय कर आणि तयार हो. " आपल्या शास्त्रानुसार फार पूर्वीपासून युद्धांमध्ये वीरमरणाची प्राप्ती व्हावी याला अपार महत्व दिले गेलंय. आणि अशा या वीरांचे स्मरण येणाऱ्या पिढीला कायमस्वरूपी होत राहावं म्हणून जो शिल्प विशेष उदयाला आला तो म्हणजे विरगळ (Herostone )! वीरगळ समजून घेण्यासाठी त्याच्या मुळ संरचनेला समजून घ्यावं लागतं. काळ आणि स्थानपरत्वे त्याच्या रचनेत थोडं भिन्नत्व आहे परंतु वीर मरण आलेल्याचं स्वर्गरोहण आणि स्वर्गप्राप्ती या मूलभूत गोष्टी प्रत्येक शिल्पात आढळून येतात .  वीरगळ बनवण्याची संकल्पना ही साधारणतः सातवाहन क...